नवी दिल्ली : भारत फायनान्शिअल इन्क्लुजन लिमिटेडच्या (बीएफआयएल) ‘संजीवनी’ या सामाजिक उपक्रमाला ‘आव्हानात्मक परिस्थितीमधील सीएसआर (पूर्व) २०१९’ या कॉर्पोरेट सीएसआर पुरस्काराने गौरवण्यात आले. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातर्फे समाजामध्ये परिवर्तनात्मक परिणाम घडवणाऱ्या कंपन्यांना हा पुरस्कार दिला जातो. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या समारंभामध्ये भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘बीएफआयएल’चे चीफ पीपल ऑफिसर व सीएसआर प्रमुख श्रीनिवास रेड्डी वुदुमुला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक एम. आर. राव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
‘संजीवनी’ या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध केल्या जातात. यामधील ‘डॉक्टर-अॅट-डोअरस्टेप’ या अॅप-आधारित सुविधेचा वापर करून, कोणत्याही शेतकऱ्याला टोल-फ्री क्रमांकावर कॉल करता येतो आणि गुरांवरील उपचार, इमर्जन्सी केअर, लसीकरण, आदीबाबतीत सेवा मिळवता येऊ शकते.
या वेळी बोलताना, बीएफआयएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक एम. आर. राव म्हणाले, ‘हा पुरस्कार मिळणे हा आमचा मोठा सन्मान आहे. ग्रामीण भारतातील रोजगाराला पाठिंबा देण्यासाठीची आमची बांधिलकी आणि केवळ क्रेडिट पुरवण्यापलीकडेही सेवा देण्याचा आमचा प्रयत्न या पुरस्काराने अधोरेखित झाला आहे. ‘बीएफआयएल’ भारतातील २० राज्यांतील एक लाखांहून अधिक गावांमध्ये काम करत आहे. ग्रामीण भागातील लोकांबरोबर काम करण्याचा आमचा अनुभव आणि त्यांच्या गरजांचे आकलन यामुळे संजीवनी उपक्रम साकार होण्यास मदत झाली. २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाव्दारे झारखंड, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश येथील ७१ जिल्ह्यांतील आठ लाख शेतकरी व नऊ लाखांहून अधिक गुरे यांना सेवा दिली आहे. हा कार्यक्रम भारतातील अन्य राज्यांतही विस्तारला जाईल, अशी अपेक्षा आहे.’
‘संजीवनी उपक्रम ‘१०८’अॅम्ब्युलन्स सेवेशी निगडित असून, ती ग्रामीण भागातील जनावरांसाठी आहे, इतकाच फरक आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना गुरांवरील उपचारासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागत होती व पात्र नसणाऱ्या व्यक्तींकडून उपचार करून घ्यावे लागत होते. त्यातून त्यांची सुटका झाली आहे,’ असं ‘बीएफआयएल’चे चीफ पीपल ऑफिसर व सीएसआर हेड श्रीनिवास रेड्डी वुदुमुला यांनी सांगितले.